अप्सरा आली! सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शेगावच्या कठोरा गावात “श्रमदान”

शेगाव,(प्रतिनिधी): प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उदयास आलेली, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना”ला गती देण्यासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने पुढाकार घेतला आहे. केवळ “पाणी अडवा, पाणी जिरवा”, मंत्राचा नारा न देता, तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सोनालीने चक्क कठोरा (ता.शेगाव) येथील शेताच्या बांधावर जाऊन श्रमदान केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीचा उत्साह संचारला असून याठिकाणी लोकसहभागातून गाव समृद्धीचा नवा पॅटर्न समोर येतांना दिसत आहे.
कृत्रिम बंधाऱ्यांची निर्मिती या अभियानांतर्गत कठोरा परिसरात पावसाचे पाणी अडवण्यासाठी ठिकठिकाणी कृत्रिम बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी हे बंधारे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने या ठिकाणी संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात लोकसहभाग वाढवणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट होते. सहसा चंदेरी पडद्यावर दिसणारी अभिनेत्री सोनाली जेव्हा प्रत्यक्ष हातात पाटी-घमेले घेऊन कामाला लागली, तेव्हा संपूर्ण गाव थक्क झाले. सोनालीने केवळ मार्गदर्शन केले नाही, तर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कृत्रिम बंधारे बांधण्याच्या कामात सहभाग नोंदवला. तसेच गावामध्ये आतापर्यंत झालेल्या विकासकामांची तिने बारकाईने पाहणी केली. महिला बचत गटांचे कार्य, स्वच्छता अभियान आणि जलसंधारणाची कामे पाहून तिने प्रशासनाचे आणि ग्रामस्थांचे कौतुक केले. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून या कामात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झाडाला मूल म्हणून जपा: सोनाली कुलकर्णी
दरम्यान, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गावातील नदीकाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सोनाली कुलकर्णीच्या हस्ते परिसरात विविध फळझाडे आणि सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी केवळ झाड लावून चालणार नाही, तर ते मूल म्हणून जगवले पाहिजे, असा मोलाचा संदेश तिने यावेळी उपस्थित तरुणांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!