बाजार गल्ली जोड रस्त्यावर सांडपाण्याचा कहर

अभिनय बोर्डेबुलढाणा,(प्रतिनिधी): धाडनगरीला महामार्गाशी जोडणाऱ्या बाजार गल्ली परिसरातील वार्ड क्रमांक ६ मध्ये सध्या सांडपाण्याचे कहर केला आहे. नालीचे घाण पाणी थेट नागरिकांच्या अंगणात शिरत असल्याने रहिवाशांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. आमच्या आरोग्यास अपाय झाल्यास याला जबाबदार कोण असणार?” असा तिखट सवाल आता नागरिक विचारत आहेत.

या परिसरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या पूर्णपणे तुंबल्याने नालीतील दुर्गंधीयुक्त पाणी चक्क रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरासमोर साचत असल्याने घरांच्या अंगणाला तलावाचे स्वरूप आले आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरिया आणि तापेसारख्या आजारांची भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात अनेकदा आवाज उठवून तसेच साचलेल्या पाण्याचे फोटो आणि व्हिडिओ पुरावा म्हणून प्रशासनास सादर करूनही त्यांना आश्वासनाच्या खैरातीशिवाय काहीच मिळत नसल्याची हताश भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

साचलेल्या सांडपाण्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी यामुळे एखादा संसर्गजन्य आजार पसरला तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. आता तरी संबंधित विभागाने सुस्त निद्रा त्यागून नालीची दुरुस्ती करावी आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत असून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!