अजय टप
बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यात सध्या भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. रक्षणकर्ते झोपले आहेत की काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहेत. गेल्या केवळ ६० तासांत ११ व्यक्ती बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी ताजी असतानाच, आता पुन्हा तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दोन तरुण महिला आणि एका दिव्यांग महिलेचे बेपत्ता होणे, ही साधी घटना नसून एका मोठ्या संकटाची नांदी मानली जात आहे. एकामागून एक माणसे गायब होत असताना जिल्हा पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे, असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे.
एकीकडे ‘डिजिटल इंडिया’च्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे आपल्या घरातील माता-भगिनी भरदिवसा गायब होत आहेत. ताज्या घटनांनुसार, जळंब, नांदुरा आणि लोणार या तीन तालुक्यांमध्ये बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच आहे.
जलंब: पोलीस स्टेशन जलंब अंतर्गत मोरगाव डी (ता. शेगाव) येथील अंजली भागवत कुटाफळे (वय २१ वर्षे) ही तरुणी २ एप्रिल रोजी दुपारी १.३० च्या सुमारास घरातून निघून गेली ती अद्याप परतली नाही. गोरा रंग, ५ फूट उंची आणि अंगात काळा टी-शर्ट अशा वर्णनाची ही तरुणी नेमकी कुठे गेली? तिचा शोध घेण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे.
नांदुरा: नांदुरा शहरात तर अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. कविता उर्फ रूपाली ऋषिकेश वक्टे (वय ३० वर्षे) ही महिला आपल्या पोटच्या मुलीला शाळेतून आणायला जाते, असे सांगून घरातून निघाली. मात्र, शाळा सुटली, संध्याकाळ झाली तरी ही आई घरी परतलीच नाही. मोबाईल बंद आणि नातेवाइकांकडेही पत्ता नाही. भरवस्तीतून एखादी महिला अशी गायब होणे ही सुरक्षेच्या चिंधड्या उडवणारी बाब आहे.
लोणार: लोणारमधील आझाद नगर भागातून शबानाबी शेख शब्बीर (वय ३६ वर्षे) ही मूकबधिर महिला बेपत्ता झाली आहे. ती दररोज गल्लीत फिरून गोधड्या शिवण्याचे काम करायची. बोलता येत नसूनही कष्ट करून जगणाऱ्या या महिलेला कुणी फूस लावून नेले की तिच्यासोबत काही अघटित घडले? हा प्रश्न लोणारकरांना सतावत आहे.
प्रत्येक घटनेत पोलीस स्टेशनला ‘मिसींग’चा गुन्हा दाखल होतो, तपासी अधिकारी नेमला जातो, पण प्रत्यक्षात हाती काय लागते? शून्य! गेल्या ४७ तासांत ९ जण बेपत्ता झाले आहेत. ही संख्या निव्वळ आकडेवारी नाही, तर नऊ कुटुंबांचे उद्ध्वस्त झालेले सुख आहे. जर हे सत्र असेच सुरू राहिले, तर सामान्य जनतेने सुरक्षेसाठी कुणाकडे पाहायचे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी द्यावे लक्ष
जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि बेपत्ता होणाऱ्यांचे प्रमाण पाहता, आता केवळ ‘बिट अंमलदार’ स्तरावर तपास करून चालणार नाही. यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची गरज आहे. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि संशयित टोळ्यांची कसून चौकशी होणे अनिवार्य आहे.
जनतेमधून आक्रोश
लोकांमध्ये आता संतापाची लाट आहे. विशेषतः ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. जर २४ तासांच्या आत या बेपत्ता व्यक्तींचा सुगावा लागला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.