बुलढाणा,(हिंदवार्ता ब्युरो): राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान, संत गजानन महाराजांची पावन भूमी आणि जागतिक कुतूहल असलेले लोणार सरोवर… बुलढाणा जिल्ह्याची ही ओळख जितकी अभिमानास्पद आहे, तितकीच या चकाकीच्या मागे एक दाहक वास्तव दडले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फेरफटका मारला की, घरांच्या दारांना लागलेली गंजलेली कुलपे आणि ओस पडलेल्या चावड्या एक वेगळीच, भीतीदायक कहाणी सांगत आहेत. बुलढाणा जिल्हा आता हळूहळू ‘वृद्धाश्रमांचा जिल्हा’ बनतोय की काय, असा प्रश्न पडण्याइतपत परिस्थिती गंभीर नजरेस पडत आहे.
एका सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दरवर्षी हजारो युवक रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होतात. विशेषतः १८ ते ३५ वयोगटातील ७० टक्क्यांहून अधिक पदवीधर तरुण पुणे, मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक झाले आहेत. हे स्थलांतर केवळ मजुरीसाठी नाही, तर ते ‘बौद्धिक’ आहे. जिल्ह्यात पदवीपर्यंतचे शिक्षण देणारी शेकडो महाविद्यालये आहेत, पण त्यानंतर हाताला काम देणारे मोठे उद्योग नसल्याने उच्चशिक्षित तरुण गावी राहून शेती करण्याऐवजी शहरात १०-१५ हजारांची नोकरी करणे पसंत करत आहे.
हेच चित्र शेतीचाहि कणा मोडून टाकत आहे. बुलढाणा हा प्रामुख्याने सोयाबीन आणि कापसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो; जिल्ह्यात जवळपास ७ लाख हेक्टरवर खरीप पेरणी होते, पण आज इथला शेतकरी एका विचित्र कात्रीत सापडला आहे. घरातील तरुण पिढी शहरात गेल्यामुळे शेतीची धुरा पूर्णपणे वृद्ध आई-वडिलांच्या खांद्यावर आली आहे. मजुरीचे दर गेल्या पाच वर्षांत ४० टक्क्यांनी वाढले आहेत आणि वेळेवर मजूर मिळत नाहीत, ज्यामुळे ज्या शेतीतून एकेकाळी कुटुंब जगायचे, तीच शेती आता या वयात ओझे वाटू लागली आहे. यामुळेच अनेक शेतकरी आपली जमीन कसायला दुसऱ्याला देत आहेत किंवा ती विकून शहरात स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत आहेत. ही परिस्थिती केवळ आर्थिक नसून राजकीय उदासीनतेचाही परिणाम आहे. निवडणुका आल्या की १८.५० अब्ज घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेला जिगाव प्रकल्प, लोणार सरोवराचा विकास आणि खारपाण पट्ट्यातील ८०० हून अधिक गावांचा पाण्याचा प्रश्न हे मुद्दे ऐरणीवर येतात, पण प्रत्यक्षात अंमलबजावणीचा दुष्काळच पाहायला मिळतो.
जिल्ह्याला अनेक मंत्रीपदे मिळाली, परंतु स्थानिक स्तरावर ‘इंडस्ट्रियल हब’ तयार करण्यात सर्वच राजकीय पक्ष अपयशी ठरले आहेत. ८७ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग जिल्ह्याच्या सीमेवरून धावतो आहे, पण त्याचा स्थानिक उद्योगांना किती फायदा झाला? जिल्ह्यातील बेरोजगारीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असणे हे चिंतेचे लक्षण आहे. केवळ रस्ते चकाचक होऊन विकास होत नाही, तर त्या रस्त्यांनी स्थानिकांच्या घरात समृद्धी आणणे गरजेचे असते. या सर्वांचा सर्वात मोठा फटका जिल्ह्याच्या सामाजिक विणकामाला बसत आहे.
गावांत आता केवळ सण-उत्सवापुरती गर्दी दिसते; दसरा-दिवाळी संपली की पुन्हा तीच शांतता पसरते. या स्थलांतरामुळे ग्रामीण संस्कृतीचा कणा असलेला सामूहिक सलोखा संपत चालला असून, ६० वर्षांवरील नागरिक गावांत एकाकी पडत आहेत. जर बुलढाणा जिल्ह्याला या ‘कुलपांच्या गावांतून’ मुक्त करायचे असेल, तर केवळ धार्मिक पर्यटनाचा अभिमान बाळगून चालणार नाही. स्थानिक स्तरावर कृषी प्रक्रिया उद्योग आणि लोणारसारख्या ठिकाणी दरवर्षी येणाऱ्या ३ ते ४ लाख पर्यटकांना थांबवून घेणारे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र उभारून स्थानिकांना रोजगार द्यावा लागेल. अन्यथा, येत्या दशकात जिल्ह्याचा भूगोल शिल्लक असेल, पण त्यात चैतन्य देणारी तरुण पिढी मात्र नसेल, एवढे मात्र खरे!