
शेतात धान्य पिकविण्यासाठी शेतकरी अहोरात्र मेहनत करतात. मात्र, त्याच अन्नाची नासधूस होवून ते नालीत फेकल्या जात असल्यामुळे सदर अन्न सडून रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता पाहता, मोताळा तालुक्यातील तरोडा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ॲक्शन मोडवर येत गावात दवंडी देवून अन्न नालीत टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
‘अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे’ अन्न केवळ पोट भरण्याचे साधन नाही. ते जीवन, उर्जा आणि सृष्टीचा आधार आहे. अन्नाचा आदर करावा, ते वाया घालू नये..पाहिजे तेवढेच घ्यावे योग्य प्रमाणात सेवन करावे, असे भारतीय संस्कृतीत सांगितलेले आहे. शेतात अन्न पिकविण्यासाठी शेतकरी अहोरात्र कष्ट करतात. मात्र, तरोडा गावात नाल्यांमध्ये कचरा आणि शिजविलेले अन्न टाकल्या जात असल्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता पाहता ग्रामपंचायत प्रशासन अधिकाऱ्यांनी २४ डिसेंबर रोजी दवंडीचे एक पत्रक जारी करीत शिजविलेले अन्न नालीमध्ये टाकू नये. जे नागरिक अन्न नालीमध्ये टाकतात. त्यामुळे रोगराई पसरल्यास अन्न टाकणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे संकेत त्यांना दिले आहे. हा स्वच्छतेचा एक स्तुत्य निर्णय असून या निर्णयाचे तालुक्यात कौतूक होत आहे. मात्र, रोगराई पसरल्यानंतर नालीत अन्न टाकणाऱ्यांना पकडण्याचे ग्रामपंचायत प्रशासनासमोर एक मोठे आव्हान राहिल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



