
छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : चालकाचे करारातील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना कन्नड-चाळीसगाव मार्गावरील गौताळा घाटातील व्ह्यू पॉइंटजवळ घडली. ७ जानेवारीच्या रात्री अंदाजे साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
जेवगाव (जि.अहिल्यानगर) येथील ७ जिगरी मित्र एमएच-१६-डीएस-६०५० क्रमांकाच्या कारणे देवदर्शनासाठी उज्जैनला चालले होते. ही कार कन्नड-चाळीसगाव मार्गावरील गौताळा घाटातील व्ह्यू पॉइंटजवळ येताच चालकाचे त्याच्या ताब्यातील कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे सदर कार घाटातील कठड्यावर जाऊन आदळली. रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक घटनास्थळी थांबून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे चाळीसगाव ग्रामीण पोलिसही घटस्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना गाडीच्या बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात रवाना केले. अपघात इतका भीषण होता की, कारचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
दरम्यान, रुग्णालयात उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तूकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७ वर्षे), शेखर रमेश दरपते (वय ३१ वर्षे) आणि घनशाम रामहरी पिसोटे (वय ३० वर्षे) सर्व रा.शवगाव यांना मृत घोषित केले. तर योगेश सोनवणे, अक्षय गिरे, ज्ञानेश्वर मोडे यांना प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी धृूळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तूषार घुगे याला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शवगावमध्ये शोककळा पसरली आहे.


