स्मार्ट बुलढाणा

अरेच्चा! मलकापूर बाजार समितीत नियमबाह्य भंगार विक्री?

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत काही महाभागांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, मोठ्या प्रमाणात भंगार साहित्याची विक्री केल्याची जोरदार चर्चा शहरात सुरु आहे. संबंधीतांनी कुठलीही औपचारीकता न पळता, कोणत्याच वृत्तपत्र जाहिरात किंवा निविदा प्रकाशीत न करता, भंगार विक्रीची प्रक्रिया पार पाडल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडली असून सदर प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

कोणत्याही शासकीय कार्यालयातील भंगार साहित्याची विक्री करण्यासाठी शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत. भंगार किंवा मालमत्तेची विक्री करावयाची झाल्यास त्या साठी खुली निविदा परिसरातील प्रसिद्ध अशा वृत्तपत्रात प्रकाशी करावी लागते. विक्रीसाठी स्पर्धात्मक दर प्रक्रिया अत्यावश्यक असते. असे असतांना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सर्व नियमांना धाब्यावर बसवून आपल्या वैयक्तीक आर्थिक फायद्यासाठी भंगार विक्रीचा परस्पर व्यवहार केल्याची जोरदार चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. बाजार समितीच्या वतीले करण्यात आलेल्या या कथित व्यवहारामुळे शासनाने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे. भंगार विक्रीचा हा गोरखधंदा नेमका कोणाच्या आशीर्वादाने करण्यात आला?, भंगार विक्री करणाऱ्यांचा पाठीराखा कोण?, सदर पैसे कोणाच्या घशात गेले?, असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

नानाविविध संकटांच्या मालीका शेकऱ्यांवर सुरु आहे. शेतमालाला भाव नाही. डोक्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा बिकट परिस्थितीतून जाणाऱ्या बळीराजाच्या हितासाठी कृषी उत्पनन बाजार समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीतून शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार होणे अभिप्रेत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्याच या संस्थेतच पारदर्शक कारभाराचा बोजवारा उडाला असून घडलेला प्रकार म्हणजे शासनाचाच नाही, तर शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा देणारा आहे. या घडलेल्या गंभीर प्रकरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संबंधित अधिकारी, कर्मचारी, संचालक मंडळाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकाराकडे जिल्हा उपनिबंधक, बाजार समिती विभाग व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सत्य बाहेर काढावे, अशी मागणी होत आहे. सोबतच भंगार विक्रीच्या संपूर्ण प्रक्रिया तत्काळ रद्द कराव्यात, नियम धाब्यावर बसवणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी , तसेच आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्यात, अशी जोरदार मागणी देखील शहरवासियांसह शेतकऱ्यांनी केली आहे. बाजार समिती प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!