स्मार्ट बुलढाणा
एकल महिलांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन सोबतीला : अमोल दिघुळे

बुलढाणा, (प्रतिनिधी): यावर्षी एकल महिलांच्या सर्वागीन प्रगतीसाठी ‘महिला बने जिम्मेदार, बनेगी एक दुसरे का आधार’ या थीमवर आपण सर्व मिळून काम करु, असे सांगून एकल महिलांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन त्यांच्या सोबतीला आहे, असे विचार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल दिघुळे यांनी व्यक्त केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय बुलढाणा अंतर्गत कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशन बुलढाणा, आस्था शिक्षण व क्रीडा बहुउद्देशीय संस्था बुलढाणा, सखी वन स्टॉप सेंटर, अस्मिता इन्स्टिटयूट फॉर डेव्हलपमेंट, बुलढाणा, दिव्यज्योती बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत १४ जानेवारी २०२६ रोजी सखी वन स्टॉप सेंटर येथे झालेल्या तिळगुळच्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. बुलढाणा जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकल महिलांची संख्या ८४ हजार पेक्षा जास्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या एकल महिलांच्या पुनर्वसन आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे एकल बालकांचे सर्वेक्षण, ग्रामीण भागातील सध्याची बचत गटातील एकल महिलांची सद्यस्थिती, तालुकास्तरावर एकच महिलांचे रोजगार मिळावे घेण्याबाबत काम सुरू आहे. त्यामुळे एकल महिलांनी खचून न जाता हिमतीने उभे राहावे. कोरोना नंतर एकल महिलांचे प्रश्न सातत्याने राज्य समन्वय तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंभ कुलकर्णी यांच्यामार्फत शासन स्तरावर पाठपुरावर केल्यानंतर मिशन वासल्य समिती स्थापन करण्यासाठीचा शासन निर्णय झाला. या समितीच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग एकत्र येऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
एकल महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी,त्यांचे पुनर्वसन,उपजीविकाचे प्रश्न, पुनर्विवाह साठीचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली एकल महिलांसाठी समुपदेशन सेंटरचे काम लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे मत प्रास्ताविकामध्ये मिशन वासल्य समितीचे तालुकास्तरीय अशासकीय सदस्य महेंद्र सौभागे यांनी सांगितले. महिलांनी विज्ञानाची कास धरून अंधश्रद्धेच्या व जुन्या चाली रितींना मूठमाती देऊन पुढे यावे, असे आवाहन प्रा. शाहीना पठान यांनी केले. यावेळी वैशाली सोमनाथे, विद्या नागशेट्टीवार, प्रा. ज्योती पाटील रामेश्वर वसु, ज्योती धंदर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आशा बोर्डे, प्रज्ञा लांजेवार, डॉ.मंजुश्रीराजे जाधव, कल्पना माने, विजया किनोळकर, लक्ष्मी ताठे, वैशाली मुंडे, सपना काकडे, राजेश सुरपाटणे, मंगेश उमाळे, उमेश निकाळे, नकुल वरखेडे, गौतम पाटील, ज्योती आडावे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधकची शपथ देण्यात आली. संचालन प्रतिभा भुतेकर तर आभार प्रदर्शन गोपाल घेवंदे यांनी केले.



