महाराष्ट्र माझा
ब्रेकिंग:उपोषणास्त्र उपसले! शेकडो सुरक्षा रक्षकांचे अन्नत्याग आंदोलन सुरू
अन्यायकारक मैदानी चाचणी रद्द करण्याची मागणी

अमरावती,(प्रतिनिधी) : सुरक्षा रक्षक मंडळाने सुरक्षा रक्षकांची घेतलेली अन्यायकारक मैदानी चाचणी आणि अन्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात शकडो सुरक्षा रक्षकांनी आज १९ जानेवारी २०२६ पासून अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयासमोर “उपोषणास्त्र” उपसले आहे.मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाला अल्टिमेटम देण्यात आला असून तत्काळ दाखल न घेतल्यास कुटुंबासह ‘अर्धनग्न व अर्धदफन’ आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशाराही प्रहारचे जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे अमरावती विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सन २०२२ पासून अनेक सुरक्षा रक्षकांच्या फाईल्स नोंदणीसाठी प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ४ डिसेंबर २०२५ रोजी नवीन शासकीय निर्णय नुसार सुरक्षा रक्षकांची मैदानी चाचणी घेण्यात आली. मात्र, ही चाचणी पोलिसांच्या भरती प्रक्रियेप्रमाणे कठीण घेण्यात आल्याने, त्यामध्ये ६३ अनुभवी सुरक्षा रक्षक अपात्र ठरले.
कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांची शारीरिक क्षमता आणि कामाचे स्वरूप पाहता त्यांच्यावर पोलीस भरतीचे निकष लावणे चुकीचे असल्याचे म्हणत सुरक्षा रक्षकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध प्रहारने आज १९ जानेवारीपासून रणशिंग फुंकले आहे. अमरावती विभागातील शेकडो सुरक्षारक्षकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून नवीन शासन निर्णय रद्द करून या सुरक्षा रक्षकांची मैदानी चाचणी जुन्या नियमानुसारच घ्यावी, अशी मागणी कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे आणि विशाल दंडगव्हाळ (कामगार जिल्हाध्यक्ष, अकोला) यांच्या नेतृत्वात या सुरक्षा रक्षकांनी केली आहे. शासनाने तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करत कुटुंबासह ‘अर्धनग्न व अर्धदफन’ आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
बच्चू कडूही उतरणार आंदोलनात

दरम्यान, गरिबांचा कैवारी म्हणून ओळख असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांची सुरक्षा रक्षकांनी भेट घेतली. “अन्याय तिथे प्रहार”, हा मूळ स्वभाव असलेल्या कडू यांनी सदर बाब गांभीर्याने घेतली असून शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास स्वतः कडू देखील मैदान उतरणार असल्याची माहिती आहे.


