श्रीक्षेत्र जाळीचादेव दांडीयात्रेस २८ जानेवारीपासून प्रारंभ

मासरूळ,(प्रतिनिधी):देशभरातील महानुभाव संप्रदायातील अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान हा भव्य यात्रा महोत्सवाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे व तसेच सर्वज्ञ चक्रधर स्वामींची भव्यरथ यात्रा माघ शुद्ध पौर्णिमा १ फेब्रुवारी २०२६ रविवार रोजी संध्याकाळी ठिक ८ वाजता होणार आहे, अशी माहीती सर्व संत, महंत व पुजारी तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आली आहे.
जाळीचा देव हे भोकरदन तालुक्यातील विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवरील एक गाव आहे. महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांचे काही काळ वास्तव्य होते. तर मासरूळ येथे एक मास स्वामीजींचे वास्तव्य राहिले. श्रीक्षेत्र जाळीचा देव अजिंठ्यापासून २८ आणि बुलडाण्यापासून २५ किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे जाळीचा देव हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेले पवित्र स्थान आहे. महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर स्वामी बाराव्या शतकात महाराष्ट्रभ्रमण करत होते. ते श्री चक्रधर स्वामी गंगातीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुणी, चांगदेव, हरताळा येथे आले. हरताळा येथून स्वामी सावळदबारा येथे आले. येथून वालसावंगी (जि. जालना) येथे जाताना या घनदाट अरण्यात करवंदाच्या जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले. त्या ठिकाणी यांना दोन वाघिणीची पिल्ले दिसली. ते त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरुवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्या ठिकाणी आली व गर्जना करू लागली . स्वामींनी तिच्याकडे कृपाकटाक्ष टाकताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे स्वामींकडे पाहून शेपटी हलवू लागली. ही लिळा(घटना) वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली. म्हणून या तीर्थक्षेत्राला जाळीचा देव हे नाव पडल्याची आख्यायीका आहे.
मासरूळ येथे सुद्धा साजरा होतो स्वामींचा भव्य महोत्सव
मासरूळ येथे सर्वज्ञ चक्रधर स्वामीचे भव्य मंदिर असून येथे एक महिना सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे वास्तव्य राहिले असून यामुळेच या गावची ओळख मास म्हणजे महिना व रूळ म्हणजे राहणे चक्रधर स्वामींचे एक महिना वास्तव्यास असल्यामुळे या गावाला ‘मासरूळ’ अशी ओळख असल्याची आख्यायिका आहे. या माघ शु. पौर्णिमेला परराज्यातील भाविक सुद्धा मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. मासरूळ येथे चक्रधर स्वामीची दोन भव्य मंदिर आहेत. एक गावामध्ये व एक मळ्यातील मंदिर असल्यामुळे येथे उपदेशी मंडळी सुद्धा बऱ्याच प्रमाणात पायी पदयात्रा व वाहनाने भाविक भक्त दर्शनासाठी येतात व सर्वांच्या सहभागातून सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा उत्सव साजरा करण्यात येतो.



