महाराष्ट्र माझा
कृषीमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार:पणन मंत्री जयकुमार रावल
मॅग्नेट २.० प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक

मुंबई,(प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प राज्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना आणि कृषीमूल्य साखळी मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सांगून या प्रकल्पाच्या माध्यमातून पणन विषयक गुंतवणूक, कृषीमालाचे मूल्यवर्धन व रोजगार वाढीस गती देणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस आशियाई विकास बँकेच्या संचालक (भारत) श्रीमती मिओ ओका, संचालक ताकेशी उडेओ, क्रिशन रौटेला तसेच पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांच्यासह प्रकल्पाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मॅग्नेट प्रकल्पाच्या राज्यातील प्रगतीबाबत आश्वस्त करताना प्रकल्पाच्या अंमलबजावणीद्वारे राज्यात पणनविषयक गुंतवणूक व रोजगार निर्मितीस चालना मिळाली असल्याचे नमूद केले. मॅग्नेट २.० बाबत चर्चा करताना राज्यातील कृषीमालास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याकामी शेतकरी उत्पादक संस्थांसाठी उत्तम कृषी तंत्रज्ञान, कृषीमालाची हाताळणी, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, ब्रँण्डींग, जागतिक स्तरावरील कृषी मूल्य साखळ्यांचा अभ्यास, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संस्थात्मक बळकटीकरण, पोषकतत्व आधारीत बाजारपेठ, कार्बन क्रेडीट, हवामान अनुकूल धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ग्रामीण स्तरावरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी, तसेच शहर स्तरावरील मोठ्या बाजारसमित्यांमध्ये डिजिटायझेशन, घनकचरा व्यवस्थापनाचा अवलंब याबाबींवर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच महिला सक्षमीकरणाबाबत आशियाई विकास बँकेचे अधिक सहकार्य मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत विकसित महाराष्ट्र व्हिजन २०४७ च्या अनुषंगाने पणन विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
प्रकल्पाच्या प्रगती तपासणीसाठी आशियाई विकास बँकेचे शिष्टमंडळ १९ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. क्रिशन रौटेला यांच्या अध्यक्षतेखालील या शिष्टमंडळामध्ये श्रीमती प्राची शर्मा, बॅण्डो एंजेलीस, मॅरी मागरिट, श्रीमती टोकोमो काटो, नायर, अनिता कुमारी, गोविंद देसाई, सुमित राठोड, अखिलेश सम्याल, गुरविंदर सिंग, भुवनेश्वरी बालसुब्रमण्यम यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, एनआयपीएचटीचे संचालक मिलींद आकरे, प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव आदींचा सहभाग होता.
या शिष्टमंडळाने विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात उभारणी करण्यात आलेल्या निवडक प्रक्रीया प्रकल्प तसेच राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे येथे प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान प्रकल्प लाभार्थी आणि विशेषत: महिला सभासदांशी चर्चा करुन प्रकल्पाकडून अन्य कोणत्या प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे, याबाबत माहिती घेतली.
मॅग्नेट प्रकल्पाच्या मुख्य उद्देशांमध्ये राज्यातील १४ फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मुल्यसाखळ्यांमध्ये खाजगी गुंतवणूक आकर्षित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व त्यांची साठवणूक क्षमता वाढविणे, मागणीनुसार मालाची मूल्यवृद्धी करणे आणि वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे, शेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्यसाखळीतील सहभाग वाढविणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रकल्पाचे हे उद्देश साध्य करण्यासाठी उत्पादक आणि उद्योजकांना नवीन व संघटीत बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक तांत्रिक साहाय्य, पायाभूत सुविधा उभारणीसाठी साहाय्य, मध्यम मुदत कर्ज आणि खेळते भांडवल पुरविण्यात येत आहे. मॅग्नेट प्रकल्पाचा वित्तीय आराखडा १४२.९ दशलक्ष अमेरीकन डॉलर्स इतका असून प्रकल्पाचा अंमलबजावणी कालावधी सन २०२१-२२ ते २०२७-२८ असा आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. समारोप बैठकीमध्ये प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर सादरीकरण करुन आशियाई विकास बँकेच्या शिष्टमंडळाने प्रकल्पाच्या उल्लेखनीय कामाबाबत समाधान व्यक्त केले.


