क्राईम जगत
मलकापूर शहर पुन्हा हादरले:चिमुकल्यांसह माता, तर दुसऱ्या घटनेत तरुणी बेपत्ता

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेपत्ता होण्याच्या दोन नवीन घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत एक ३३ वर्षीय महिला आपल्या ११ वर्षांच्या मुलीला आणि ८ वर्षांच्या मुलाला घेऊन “शाळेचे प्रोजेक्टचे साहित्य आणते”, असे सांगून घराबाहेर पडली.मात्र, घरी परतलीच नाही. तर दुसऱ्या घटनेत एक २२ वर्षीय तरुणी घरात कुणाला काहीही न सांगता रात्रीच्या सुमारास निघून गेल्याने मलकापूरनगरीला पुन्हा एकदा हादरा बसला आहे.
मलकापूर शहरातील हनुमान नगर परिसरात राहणारे वसंतकुमार कांतीलाल पटेल यांच्या पत्नी मित्तल पटेल (वय ३३ वर्षे) ह्या ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता दरम्यान मुलांच्या प्रोजेक्टचे साहित्य आणायला जात आहे, असे सासूला सांगून घरातून निघून गेल्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिया (वय ११ वर्षे) आणि मुलगा देवांश (वय ८ वर्षे) हा देखील आहे. पटेल यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाही. मित्तल पटेल हिचा रंग गोरा असून उंची ५ फूट आहे. तिने सोनेरी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला असुन सोबत दोन बॅगा आहेत. तर सिया पटेल हिचा रंग सावळा असून तिने काळ्या रंगाचा फुलांचा ड्रेस परिधान केलेला आहे. चिमुकला देवांश पटेल याचा रंग सावळा असून त्यांच्या अंगात आकाशी टी-शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेली आहे. या प्रकरणी पटेल यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात ai असून पुढील तपास पोलीस अंमलदार रवींद्र दळवी हे करत आहेत. तर दुसऱ्या घटनेत शहरातील सालीपुरा भागात राहणारी तरुणी कविता दयाराम वाढे (वय २२ वर्षे) ही देखील ३० जानेवारीच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास कोणाला काहीच न सांगता घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. या प्रकरणी तिचे वडील दयाराम वाढे यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. बेपत्ता झालेल्या कविताचा रंग गोरा, बांधा सडपातळ असून तिने कथिया रंगाचा पंजाबी टॉप आणि पांढरी सलवार परिधान केलेली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे हे करत आहेत.
४ दिवसांत ४ मुली बेपत्ता
केवळ मलकापूरच नव्हे, तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होण्याचे सत्र वाढले आहे. जिल्ह्यातून गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणांहून चार मुली बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत. तर एका प्रकरणात अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचीही तक्रार दाखल आहे. या घटनांमुळे जिल्हा पोलीस दलासमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.



