नांदुरा हादरले: हुंड्यापाही विवाहितेची आत्महत्या
पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप; नांदुरा पोलिसांत पतीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : एकीकडे आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांना देवीचा दर्जा दिला जातो. तर, दुसरीकडे याच देवीचा हुंड्यासाठी छळ होतो. नव्हे तर तिच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या जाते. अशीच काहीशी घटना नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे समोर आली. लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांतच एका २९ वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यांसह एकूण ७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या चांगलवाडी येथील रहिवासी असलेले रामदास भगवान डवले यांची मुलगी भारती विशाल पाऊलझगडे (वय २९ वर्षे) हिचा विवाह ५ वर्षांपूर्वी निमगाव येथील विशाल पाऊलझगडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस विशालने भारतीय सोबत सुखाने संसार केला. मात्र, काही दिवसानंतर पती विशाल आणि सासरच्या मंडळीने भारतीचा छळ सुरू केला. तुझ्या माहेरवरून पाच लाख रुपये होण्याची रक्कम घेऊन ये, असे म्हणत तिच्याकडे वारंवार दगादा लावला. ही रक्कम आणण्यास भारती असमर्थ ठरल्याने सासरच्या मंडळींकडून तिला टोचून बोलणे आणि शारीरिक-मानसिक त्रास देण्याचे प्रकार ८ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होऊन तो १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सतत सुरू होता. हा त्रास सहाय्य झाल्याने भारतीने आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी भारतीचे वडील रामदास डवले यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती विशाल पाऊलझगडे, सासरे रामदास पाऊलझगडे, सासू रत्नप्रभा पाऊलझगडे, दीर वैभव पाऊलझगडे, नणंद अनिता जयसिंगपुरे, सुनिता मनसुटे आणि श्रद्धा पाचपोर हीच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०८, ८०(२), ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.
पतीचे विवाहबाह्य संबंध?
भारतीचा पती विशाल याचे श्रद्धा नामक महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. याच कारणावरून तो वारंवार दारू पिऊन घरी यायचा आणि भारतीला मारहाण करायचा. पतीचे चारित्र्य आणि सासरच्यांची पैशांची हाव, अशा दुहेरी कात्रीत भारती सापडली होती. हुंड्यासाठीचा छळ आणि पतीच्या अनैतिक संबंधांमुळे तिला देण्यात येणाऱ्या त्रासामुळे पुणे आत्महत्या केल्याचा आरोपही रामदास डवले यांनी तक्रारीतून केला असून भारतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.



