खळबळजनक: जन्मदाता बाप आणि भाऊच ठरला काळ
जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाची हत्या; सावरगाव मुंढे येथील घटना

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : शेतीच्या वाटणीवरून आणि वारस म्हणून मुलगाच हवा असल्याच्या हट्टापायी एका पित्याने आणि भावाने मिळून ३२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केली. लोणार तालुक्यातील सावरगाव मुंढे येथे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलह आणि जमिनीचा वाद किती भीषण रूप धारण करू शकतो, याचा प्रत्यय या घटनेतून आला.
सावरगाव मुंढे (ता.लोणार) येथील रहिवासी असलेले कृष्णा गणेश चव्हाण (वय ३२ वर्षे) यांचे त्यांच्या कुटुंबासोबत गेल्या काही काळापासून जमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू होते. याच वादातून त्यांची त्यांच्याच राहत्या घरी हत्या करण्यात आली. रेणुका कृष्णा चव्हाण (वय ३० वर्षे) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या लग्नाला ६ वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने आणि त्यानंतर मुलगी झाल्याने सासरच्या लोकांचा त्यांच्यावर राग होता. “आम्हाला वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे होता,” या मानसिकतेतून आणि जमिनीचा हिस्सा द्यावा लागेल, या भीतीने आरोपींनी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाद घातला. नव्हेतर हा वाद विकोपाला गेला. आरोपी गणेश रूपचंद चव्हाण (वडील) आणि सोनू गणेश चव्हाण (भाऊ) यांनी जमिनीच्या वाटणीवरून संगनमत करून कोणत्याही तरी जड वस्तूने किंवा शस्त्राने कृष्णा यांच्या डोक्यावर जबर वार केले. या हल्ल्यात कृष्णा यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतक कृष्णा यांची पत्नी रेणुका चव्हाण सध्या हिंगोली जिल्ह्यातील डोंगरगाव (ता. सेनगाव) येथे होत्या. पतीची हत्या झाल्याची माहिती मिळताच त्यांनी लोणार पोलीस स्टेशन गाठून “जमिनीचा हिस्सा द्यावा लागेल या कारणावरून माझ्या पतीला सासरा आणि दीराने मिळून ठार मारले,” अशी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.



