एल्गार: किन्ही महादेव फाट्यावर धडाडणार बच्चू कडू यांची तोफ
भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन; शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि वाढत्या संकटांच्या पार्श्वभूमीवर, उद्या बुधवारी, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता किन्ही महादेव फाटा येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण माजी मंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू असून, ते याप्रसंगी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपली आक्रमक भूमिका मांडणार आहेत.
सध्याचा शेतकरी वर्ग नैसर्गिक आपत्ती, हमीभावाचा अभाव आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे मेटाकुटीला आला आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळणे आणि शेतीचा वाढलेला खर्च. पीकविमा योजनेतील तांत्रिक अडचणी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची प्रलंबित मदत. कर्ज घेताना निर्माण होणारी बँकिंग प्रक्रियेतील गुंतागुंत आणि शेतकऱ्यांची अडवणूक. अपुऱ्या सिंचन सोयींमुळे शेतीवर होणारा परिणाम, या विषयावर प्रामुख्याने मंथन करणार आहे.
या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ भाषणे न होता, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आपली मते आणि समस्या मांडण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही केले जाणार असून आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित या मेळाव्यास पक्षाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख नितीन आगे, वैभवराजे मोहिते, उपजिल्हाध्यक्ष अजय टप, आणि तालुका अध्यक्ष रामा बोरसे यांचा समावेश असणार आहे. शेतकरी आज मोठ्या संकटात आहे. बँकिंग आणि प्रशासकीय पातळीवर होणारी त्यांची कुचंबणा थांबवणे आवश्यक आहे. या मेळाव्यातून आम्ही सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवणार आहोत, असे आयोजकांनी सांगितले असून खामगाव तालुका आणि परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख गजानन लोखंडकार यांनी केले आहे.



