औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे थाटात उद्घाटन

शेगाव,(प्रतिनिधी): आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञान परंपरा जगाला स्वस्थ भविष्याची ग्वाही देणारी आहे. त्याचा अवलंब व प्रसार होत असतानाच, औषधी वनस्पतींचे संवर्धनही होणे आवश्यक आहे. हा केवळ शासन, प्रशासनाचा उपक्रम न राहता लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

केंद्र शासनाचे आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्यातर्फे येथील विसावा भक्तनिवास संकुल परिसरात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार संजय कुटे, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष प्रा.राकेश शर्मा, महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र त्रिगुणा यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, मन व शरीर या दोहोंचे संतुलन साधून संतुलित व आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा मंत्र योग व आयुर्वेदातून मिळतो. ‘आरोग्यं परमं सुखम्’ ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. शरीर हे सर्व कर्तव्ये पूर्ण करण्याचे साधन आहे. देशाला सशक्त बनविण्यासाठी नागरिकांचे जीवन आरोग्यपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने योग, आयुर्वेद, युनानी आदी आयुष पद्धती महत्त्वाची भूमिका बजावतात.
आयुष मंत्रालयातर्फे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांची स्थापना, आयुष औषधालये, औषधे परीक्षण प्रयोगशाळा, वैश्विक पारंपरिक चिकित्सा केंद्राचे पुनरुज्जीवन अशी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत. याबरोबरच औषधी वनस्पतींचे संवर्धन, क्षेत्रविस्तार होणेही आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मुर्मू यांनी यावेळी सांगितले.
आयुर्वेद व आयुष पद्धतींचा प्रसार व्यापक व्हावा : देवव्रत
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, भारतीय आहारपद्धतीत पूर्वापार औषधी तत्वे असलेल्या वनस्पतींचा वापर होत आला आहे. व्यक्तीला कधीही आजारपण उद्भवू नये, अशी सोय आपल्या पारंपरिक ज्ञानावर आधारित जीवनपद्धतीत होती. तथापि, आता आहारात अनावश्यक पदार्थांचा अंतर्भाव झाल्याने आजार वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे आयुर्वेद व आयुष पद्धतींचा प्रसार आयुष मंत्रालयातर्फे होत आहे. तो अधिक व्यापक व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘आयुष’मुळे देश जगात अग्रक्रमावर राहील : ना. जाधव
निरामय जीवनशैली, वेलनेस व समग्र स्वास्थ सुरक्षा ही आयुषची आधारशीला आहे. जग आज वेलनेसकडे वळले असून, भारतातील प्राचीन व पारंपरिक आयुष पद्धतीच्या संवर्धन व अवलंबामुळे आपला देश संपूर्ण जगात अग्रेसर ठरेल, असा विश्वास केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल. महाराष्ट्रातही वेगळे आयुष मंत्रालय असावे, यासाठी प्रयत्न होत आहेत. आयुष चिकित्सा व उपचारपद्धतीचा लाभ विदर्भ व महाराष्ट्रातील गरजूंना मिळावा, यासाठी हा राष्ट्रीय आरोग्य मेळावा शेगावात आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
आयुर्वेदासाठी झटणाऱ्या वैद्यांचा गौरव
आयुर्वेद क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ वैद्यांना यावेळी गौरविण्यात आले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डतर्फे आयुष मंत्रालयाला मिळालेले प्रमाणपत्र राष्ट्रपती महोदयांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. वैद्य कोटेचा यांनी प्रास्ताविक केले. आयुर्वेद महासंमेलनाचे महासचिव वैद्य एस. एन. पाण्डेय, मेळाव्याच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष वैद्य सतीश भट्टड, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधिक्षक नीलेश तांबे आदी उपस्थित होते.



