राजकारण
राज्यसभा निवडणूक २०२६: १६ मार्चला फैसला!
महायुतीचा 'सातव्या' जागेसाठी मास्टरप्लॅन; मविआची एकजूट धोक्यात?

मुंबई,(प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘राज्यसभा निवडणुकी’चा धुरळा उडाला आहे. येत्या १६ मार्चला रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी मतदान होणार असून, विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे यावेळी मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. विशेषतः ‘सातव्या’ जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखलेला प्लॅन ‘महाविकास आघाडी’ची झोप उडवणारा ठरू शकतो.
सध्याच्या विधानसभेत एका जागेसाठी विजयाचा कोटा साधारण ३६ ते ३७ मतांचा आहे. महायुतीकडे (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) सध्या २३२ हून अधिक आमदारांचे पाठबळ आहे, तर महाविकास आघाडीकडे केवळ ४६ मते शिल्लक आहेत. यामध्ये महायुतीच्या ६ जागा निवडून येऊ शकता. त्यामध्ये भाजप ३, शिवसेना १, राष्ट्रवादी १, आणि मित्रपक्ष १, तर महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता केवळ १ जागा त्यांच्या पदरात पडू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सातव्या जागेचा ‘गेम’ आणि फडणवीसांची खेळी
खरी चुरस सातव्या जागेसाठी पहायला मिळणार आहे. महायुतीकडे ६ जागा निवडून आणल्यानंतरही जवळपास ५२ हून अधिक अतिरिक्त मते शिल्लक राहतात. ही मते सातव्या जागेसाठी निर्णायक ठरू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप ही जागा स्वतःकडे न ठेवता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा एखाद्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन मविआच्या एकमेव जागेवर संकट निर्माण करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज्यसभेची ही निवडणूक केवळ ७ खासदारांची निवड नसून, ती आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीची ‘लिटमस टेस्ट’ आहे. फडणवीसांचा ‘चाणक्य’ अवतार पुन्हा दिसणार की शरद पवारांची ‘पॉवर’ चालणार, हे येत्या १६ मार्चला स्पष्ट होणार आहे.
शरद पवार की उद्धव ठाकरे?
राज्यसभेच्या या एका जागेवर सध्या काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) या दोघांनीही दावा ठोकला आहे. खुद्द शरद पवार यांची मुदत संपत असल्याने, ते पुन्हा रिंगणात उतरणार का? यावर मविआचे भवितव्य अवलंबून आहे. तर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले नाही, तर मतविभाजनाचा फायदा घेऊन महायुती सातवी जागा खिशात घालू शकते.
कोण आहेत चर्चेतील उमेदवार?
भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैयशील पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेनेकडून (शिंदे गट) राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा असून गजानन कीर्तिकर यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान शिंदेंसमोर उभे ठाकले आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) अजित पवारांच्या निधनानंतर आता पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवून पक्षात नवीन नेतृत्व देणार असल्याची चर्चा रंगली आहे.
‘क्रॉस व्होटिंग’ची टांगती तलवार
ही निवडणूक ‘ओपन बॅलेट’ने असली, तरी अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी महायुतीने फिल्डिंग लावली आहे. जर मविआची मते फुटली, तर ही निवडणूक राज्याच्या राजकारणात नवा भूकंप घडवू शकते, एवढे मात्र खरे!



