महाराष्ट्र माझा
ब्रेकिंग: ‘राष्ट्रीय विज्ञान दिन २०२६’; विकसित भारतासाठी महिला शास्त्रज्ञांची मोठी झेप!
पुण्यासह राज्यभर विज्ञानाचा जागर

पुणे,(प्रतिनिधी) : आज २८ फेब्रुवारी, २०२६ रोजी संपूर्ण देशभर ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी १९२८ मध्ये याच दिवशी ‘रामन इफेक्ट’चा शोध लावला होता. यंदाच्या विज्ञान दिनाची थीम “विज्ञान क्षेत्रातील महिला: विकसित भारतासाठी प्रेरक”, अशी ठेवण्यात आली असून, विज्ञानातील महिलांच्या योगदानावर विशेष भर देण्यात आल्याचे दिसून आले.
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी सी. व्ही. रामन यांनी शोधलेला ‘रामन इफेक्ट’ हा पदार्थविज्ञानातील एक क्रांती होती. यासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय आणि आशियाई शास्त्रज्ञ होते. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याची आठवण म्हणून १९८७ पासून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो. पुणे हे विज्ञानाचे माहेरघर असल्याने आज शहरातील आयसर, आयुका, जीएमआरटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भव्य प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. जगातील सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोपपैकी एक असलेल्या जीएमआरटीमध्ये आज २५ हजार हून अधिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी भेट दिली असून आयआयएसइआर येथे महिला शास्त्रज्ञांच्या यशोगाथा सांगणारे विशेष सत्र पार पडले. त्यामुळे आजचा विज्ञान दिन केवळ आठवण म्हणून नाही, तर अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक विचारसरणी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी साजरा केला जात आहे. ‘एआय’ आणि ‘क्वांटम टेक्नॉलॉजी’च्या युगात भारत आता जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे.
‘विकसित भारत २०४७’ मध्ये विज्ञानाची भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिनानिमित्त शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत “भारत २०२४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर आहे आणि त्यात आपल्या शास्त्रज्ञांचे, विशेषतः महिला संशोधकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.” केंद्र सरकारने आज ‘हायड्रोजन व्हॅली इनोव्हेशन क्लस्टर’ सारख्या नवीन उपक्रमांचीही घोषणा केली केल्याचे सांगितले.
शालेय स्तरावर ‘स्टेम’ शिक्षणावर भर
राज्यातील सर्व शाळांमध्ये आज ‘विज्ञान जत्रा’ आणि प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील कोरुम मॉलमध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि रॅलीद्वारे ‘संसाधन संवर्धन’चा संदेश देण्यात आला. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी फिरत्या प्रयोगशाळांचे लोकार्पणही करण्यात आले.



