
मोताळा,(प्रतिनिधी) :
मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी बिबट्याने तळणी येथील गावापासून दीड ते २ किलो मीटर अंतरावर असलेल्या शेतशिवारात बोकड्यावर हल्ला चढवित त्याचा फडशा पाडला. त्यामुळे शेतकऱ्याचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तळणी गावातील हनुमान नगर येथील कुसुमबाई पांडुरंग तायडे व गजानन बावस्कार हे २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान तळणी शिवारात बकऱ्या चारत होते. दरम्यान, अचानक आलेल्या बिबट्याने कुसुमबाई तायडे यांच्या बोकड्यावर हल्ला चढवित त्याचा फडशा पाडला. बोकड्याला बिबट्या ओढत नेत असतांना कुसुमबाई व गजानन यांनी मोठ-मोठ्याने आरडा-ओरड केल्यामुळे बिबट्याने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र, बोकड तोपर्यंत मृत्यूमुखी पडला होता. यामुळे कुसुमबाई यांचे १० हजारांचे नुकसान झाले आहे. तळणी परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा वावर असल्याची गावात चर्चा आहे. याकडे मोताळा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून सदर हिस्त्रप्राणी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून होत आहे.



