अंढेरा:असोल्यात महिलेचा विनयभंग

चिखली,(प्रतिनिधी) : उकीरड्यावर दगडे का टाकलीत?, असा जाब विचारण्यास गेलेल्या एका ३३ वर्षीय महिलेचा आरोपीने विनयभंग केल्याची घटना ४ जानेवारी रोजी अंढेरा पोलीस स्टेशन हद्दित येणाऱ्या असोला येथे घडली. या प्रकरणी अंढेरा पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असोला येथे वास्त्वयास असलेली पीडिता ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ते ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान केरकचरा टाकण्यासाठी स्वत:च्या घराजवळील उकीरड्यावर गेली होती. त्यावेळी सदर ठिकाणी टाकलेल्या दगडांबाबत पीडितेने जाब विचारला असता, बाजूला क्रिकेट खेळत असलेल्या एका इसमाने तीच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच वाईट उद्देशाने पीडितेचा हात धरून विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता पीडितेस शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने अंढेरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुध्द भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ११५ (२), ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून ई-साक्ष देखील नोंदविण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंढेरा पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



