विवाहीतेचा छळ; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

धाड,(प्रतिनिधी): माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. एवढ्यावरच न थांबता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ही खळबळजनक घटना धाड येथे उघडकीस आली. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून आणि महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्षाच्या पत्रावरून धाड पोलिसांत पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाड येथील तवक्कलनगर परिसरात राहणाऱ्या रेशमाबी शेख करीम ऊर्फ सद्दाम (वय २८ वषे) यांचा विवाह रायपुर येथील शेख करीम ऊर्फ सद्दाम शेख हाफीज याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ या दोघांनी सुखाने संसार केला. मात्र, २५ मे २०१५ ते एप्रिल २०२३ या कालावधीत सासरच्या मंडळींनी रेशमाबी यांचा छळ सुरू केला. पतीला व्यवसायासाठी माहेरून २ लाख रुपये घेऊन ये’, अशी मागणी करत आरोपींनी रेशमाबी यांना वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला. इतकेच नव्हे तर, त्यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आणि सर्वांनी संगणमताने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी रेशमाबी शेख करीम ऊर्फ सद्दाम यांनी महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्षाकडे धाव घेतली. कक्षातील कर्मचाऱ्यांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल ठरला.
दरम्यान, पीडितेने या प्रकरणी ३१ जानेवारी २०२६ रोजी दिलेली तक्रार आणि महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्षाच्या पत्रावरून धाड पोलिसांनी रेशमाबी यांचा पती आरोपी शेख करीम ऊर्फ सद्दाम शेख हाफीज (रा.रायपुर), सासू रुखसानाबी शेख हाफीज (रा.रायपुर), नणंद नजरानाबी जमील खान (रा.देउळगाव राजा) आणि नणंद समीनाबी शेख जलील (रा.सुरत) हीच्याविरुध्द भारतीय दंड विधानाचे कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण हे करीत आहेत.



