अजय टप
लोणार : दोन आरोपींनी एका महिलेचा विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता महिलेच्या पती आणि सासऱ्याला बेदम मारहाण केली. जुन्या वादातून उद्भवली ही घटना (गुंधा ता.लोणार) येथे घडली. लोणार पोलिसांत याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या भांडणाच्या कारणांवरून महिलेच्या इज्जतीशी खेळण्याच्या या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
गुंधा (ता.लोणार) येथील रहिवासी असलेली ३४ वर्षीय महिला ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात शेतकाम करत होत्या. आरोपी धोंडू दौलत भाग्यवंत याने सदर ठिकाणी जाऊन “तुम्ही माझे शेत खाता”, असे म्हणून महिलेसोबत वाद उकरून काढला. बोलण्यात वाढत गेलेला हा वाद छेडछाडीपर्यंत जाऊन पोहोचला. आरोपीने पीडितेचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून मारहाण केली आणि धमक्या दिल्या. एवढ्यावरच न थांबता महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या तिचे पती आणि सासरे यांनादेखील दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण केली. नव्हेतर महिलेच्या सासऱ्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.
या प्रकरणी पीडित महिलेने लोणार पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७१, ७५ (२), ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन धोंडगे हे करीत आहेत. किरकोळ वादातून महिलेचा विनयभंग करणे, हे निश्चितच संतापजनक असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.