पोलीस पतीकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ, तर दिराने विनयभंग केल्याचा आरोप
पतीसह सासरच्या ८ जणांवर गुन्हा दाखल; लोणार तालुक्यात खळबळ

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : सामान्य नागरिकांवर अन्याय झाला तर न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जातात. मात्र, पोलिसांनी अन्याय केला तर दाद मागावी कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित होतो. असाच काहीसा प्रकार लोणार येथे उघडकीस आला. लग्नानंतर सुखाचा संसार करण्याचे स्वप्न घेऊन सासरी गेलेल्या एका २५ वर्षीय विवाहितेचा पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस पतीने आणि सासरच्या इतर मंडळींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी विवाहितेने लोणार पोलिसांचं दिलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस पतीसह सासरच्या ८ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लोणार तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी असलेली प्रिती नितीन चव्हाण (वय २५ वय) हिचे लग्न लोणार येथील रहिवासी असलेल्या व सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार आरोपी नितीन इंद्रजीत चव्हाण यांच्या सोबत झाले होते. लग्नानंतर आपल्या सासरी नांदायला गेलेल्या प्रीतीला सुरुवातीला चांगली वागणूक दिली. मात्र, काही काळानंतर सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तुझ्या माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी पतीसह सासरच्या इतर सदस्यांनी प्रितीला वारंवार मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार सुरू केले.
विशेष म्हणजे प्रीतीचा देर आरोपी निलेश इंद्रजीत चव्हाण याने प्रितीवर संशय घेत वाईट उद्देशाने तिचा हात धरून तिची छेडखानी केल्याचा आरोपही प्रीतीने करत बुलढाणा येथील महिला तक्रार निवारण कक्षात तक्रार दाखल केली होती. महिला तक्रार निवारण कक्ष (बुलढाणा) यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्राच्या आधारे लोणार पोलिसांनी आरोपी नितीन इंद्रजीत चव्हाण (पती), इंद्रजीत त्र्यंबकराव चव्हाण (सासरा), कालिंदा इंद्रजीत चव्हाण (सासू), निलेश इंद्रजीत चव्हाण (देर), रोशन इंद्रजीत चव्हाण, वैशाली रोशन चव्हाण, दीक्षा निलेश चव्हाण आणि अरूण त्र्यंबकराव चव्हाण (चुलत सासरा, रा. मुंबई) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ७४, ११५ (२), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार संजय जाधव हे करीत आहेत. कायद्याचे रक्षकच जेव्हा अशा गुन्ह्यात अडकतात, तेव्हा समाजातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही, एवढे मात्र खरे!



