
मुंबई,(प्रतिनिधी): आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी खाजगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया आता गती घेत आहे. नव्या शासन निर्णयानुसार २०२६-२७ या वर्षासाठीची ऑनलाईन नोंदणी उद्यापासून सुरू होत आहे. मात्र, यंदा “गुगल लँडमार्क” आणि १ किमीच्या अंतराचा नवा पेच पालकांसमोर असण्याची शक्यता आहे.
यावेळची प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत करण्यासाठी सरकारने काही तांत्रिक बदल केले असून पालकांना आता त्यांच्या घरापासून केवळ १ किलोमीटरच्या परिघातील शाळाच निवडीसाठी उपलब्ध होतील. हे अंतर निश्चित करण्यासाठी “गुगल लँडमार्क” (Google Maps) चा वापर केला जाणार आहे. आपल्या पसंतीनुसार जास्तीत जास्त १० शाळांची निवड आता करता येणार आहे. यंदा प्रवेशाची एकच मुख्य लॉटरी काढली जाणार असून निवड झालेल्या विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेनुसार आणि पसंतीनुसार एकच शाळा देण्यात येणार आहे. पूर्वी कागदपत्रे पडताळणी निवडीनंतर व्हायची, मात्र आता अर्ज भरतानाच सर्व ओरिजिनल कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत, हे विशेष!
अर्ज भरतांना लागणार ही कागदपत्रे
पालकांनी अर्ज भरताना बालकाचा अधिकृत जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा वीज बिल (भाड्याने राहत असल्यास नोंदणीकृत (Registered) भाडेकरार), आर्थिक दुर्बल घटकांसाठी (वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक), वंचित घटकातील प्रवर्गासाठी, अर्ज करताना आधारवरील पत्ता आणि अर्जातील पत्ता यात तफावत नसणे अत्यावश्यक आहे.
अर्ज कोठे आणि कसा करावा?
पालकांना प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारच्या student.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागणार आहे. अर्ज भरताना पालकांनी मोबाइल नंबर सक्रिय ठेवावा आणि अर्जात चुकीची माहिती भरू नये. माहितीमध्ये तफावत आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.


