
बुलढाणा,(प्रतिनिधी) : रायपुर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ढासाळवाडी (ता.जि. बुलढाणा) येथून ३२ वर्षीय विवाहित महिला रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी रायपुर पोलिसांत १५ फेब्रुवारीरोजी मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
ढासाळवाडी येथील रहिवासी असलेले नितीन वसंतराव शेवाळे (वय ३९ वर्षे) हे ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता नेहमीप्रमाणे बुलढाणा येथील गट्टू फॅक्टरीमध्ये कामाला गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी अश्विनी नितीन शेवाळे आणि मुलगा घरी होते.
संध्याकाळी ६.३० वाजता जेव्हा नितीन शेवाळे कामावरून घरी परतले, तेव्हा त्यांना घराला कुलूप दिसले. त्यांनी आपल्या मुलाकडे चौकशी केली असता, मुलाने सांगितले की, “मी सकाळी ९.३० वाजता शाळेत जाताना आई घरीच होती, मात्र दुपारी २.३० वाजता शाळेतून परत आल्यावर आई घरात नव्हती आणि घराला कुलूप होते.” पत्नी घरी नसल्याचे समजताच नितीन शेवाळे यांनी तातडीने आजूबाजूला आणि सर्व नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र, सहा दिवस उलटूनही अश्विनी यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर १५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी रायपुर पोलीस स्टेशन गाठून पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली. अश्विनी शेवाळे यांची उंची अंदाजे ५ फूट ३ इंच, बांधा सडपातळ, चेहरा लांबट, रंग निमगोरा असून त्यांनी अंगात साडी आणि त्यावर आकाशी रंगाचे स्वेटर घातलेले आहे. उपरोक्त वर्णनाची महिला कुठे आढळल्यास रायपूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



