
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): पाणीपुरी खाण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली २४ वर्षीय विवाहिता घरी परतलीच नसल्याची घटना संतनगरी शेगाव शहरातील मोदीनगर भागात समोर आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांत मिसींग दाखल करण्यात आली आहे.
शेगाव शहरातील मोदीनगर परिसरात राहणारे प्रविण रामदास निंबाळकर (वय ३३ वर्षे) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास प्रविण निंबाळकर कामासाठी घराबाहेर गेले होते. तर त्यांची पत्नी भारती प्रविण निंबाळकर ही घरीच होती. काही वेळानंतर भारती हिने घरी असलेल्या सासऱ्यांना “मी मुरारका चौकातून पाणीपुरी खाऊन येते, तोपर्यंत तुम्ही मुलगा अमरला सांभाळा.”, असे सांगितले आणि भारती घराबाहेर पडली. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, तिचा पत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत भारती घरी न आल्याने निंबाळकर कुटुंबीयांची चिंता अधिकच वाढली.
याप्रकरणी प्रविण निंबाळकर यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी शेगाव शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे.
बेपत्ता भारतीची उंची ५ फूट, रंग सावळा, केस लांब आणि क्रीम रंगाचे असून तिने जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, निळ्या रंगाची ओढणी, निळी लेगीज आणि पायात कथ्या रंगाचे सँडल घातलेले आहे. या वर्णनाची महिला दिसून आल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने शेगाव शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार निलेश गाडगे यांनी केले आहे.



