
साखरखेर्डा,(प्रतिनिधी): तालुक्यातील हिवरा आश्रम येथून एक १९ वर्षीय तरुणी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
हिवरा आश्रम येथील रहिवासी असलेले राजेश लक्ष्मण मोरे (वय ४२ वर्षे) हे शेतीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राजेश मोरे आणि त्यांची पत्नी हिवरा आश्रम संस्थानमधील शेतात कामाला गेले होते. त्यांचा मुलगा प्रणव हा १० वी चे पेपर देण्यासाठी गेला होता.
घरात त्यांची मुलगी ऋतुजा राजेश मोरे (वय १९ वर्षे) ही एकटीच होती. सायंकाळी कुटुंब घरी परतले असता ऋतुजा घरी मिळून आली नाही. कुटुंबीयांनी तिचा आजूबाजूला आणि सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही.
बेपत्ता ऋतुजाचा रंग सावळा, उंची: ५ फूट, मजबूत बांधा, काळे आणि लांब केस असून तिने अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे.या प्रकरणी राजेश मोरे यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी मिसिंग दाखल केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार कडुबा डोइफोडे हे करीत आहेत. या मुलीबद्दल माहिती मिळाल्यास साखरखेर्डा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संशयाची सुई ‘त्या’ तरुणाकडे?
दरम्यान, राजेश मोरे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ६ महिन्यांपूर्वी त्यांनी मुलगी ऋतुजाला सचिन प्रल्हाद थोरे (रा.भंडारी, ता. सिंदखेड राजा) याच्यासोबत फोनवर बोलताना पाहिले होते. त्यामुळे आपली मुलगी ही सचिन थोरे याच्यासोबतच निघून गेली असावी, असा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे.



