अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): शहरात सध्या एका बेपत्ता महिलेच्या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. शिवाजीनगर भागातील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय वनिता राघुनाथ दोतुंडे या गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता झाल्या असून, त्यांच्या कुटुंबियांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मिसिंगची नोंद करून शोधमोहीम सुरू केली आहे.
शिवाजीनगर भागातील रहिवासी असलेल्या वनिता दोतुंडे या ४ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्या. त्या परत न आल्याने त्यांचे भाऊ निखील भानुदास सुरडकर यांनी नातेवाईक आणि परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने अखेर १२ मार्च रोजी रात्री १०.१२ वाजता पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. वनिताचा रंग गोरा, उंची अंदाजे ५ फूट, बांधा मध्यम असून त्यांनी पांढऱ्या रंगाची साडी आणि जांभळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केलेला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सोबत एक नायलॉनची पिशवी, ज्यामध्ये जेवणाचा डबा आणि हिटर आहे.
या प्रकरणाचा तपास मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय निंबाळकर हे करत आहेत. उपरोक्त वर्णनाची महिला दिसल्यास किंवा त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळाल्यास मलकापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.