बुलढाण्याच्या कृषी क्रांतीचा डंका आता मुंबईत!

बुलढाणा,(प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्याच्या मातीतील कर्तृत्वाने आता थेट राज्याची राजधानी गाठली आहे. शेती आणि सहकार क्षेत्रात आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी क्रांती घडवून आणणाऱ्या आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जावळे यांची निवड मुंबई येथे आयोजित अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘शेतकरी उत्पादक संस्था राज्यस्तरीय परिषद २०२६’ मध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागामार्फत देण्यात आलेले हे निमंत्रण केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या कृषी प्रगतीवर उमटलेली ही एक मानाची मोहोर आहे.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे आणि महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी एक ठोस दिशा निश्चित करणे हा आहे. या महत्त्वाच्या व्यासपीठावर राजीव जावळे यांना ‘तज्ञ’ म्हणून निमंत्रित करण्यात आले असून, ते राज्यभरातून आलेल्या शेकडो संस्थांच्या प्रतिनिधींना ‘आभाळमाया’ या त्यांच्या संस्थेची प्रेरणादायी यशोगाथा सांगणार आहेत. जावळे यांच्या या निवडीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. “शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक न राहता व्यावसायिक बनले पाहिजे, हा विचार जावळे यांनी कृतीत उतरवला आहे. त्यांच्या या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे.

बुलढाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

बुलढाणा हा तसा शेतीप्रधान जिल्हा, पण येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभारलेल्या ‘आभाळमाया’ कंपनीने अल्पावधीतच जे यश संपादन केले, त्याची दखल आता थेट राज्य शासनाने घेतली आहे. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संजय कदम यांनी स्वतः पत्राद्वारे जावळे यांना या परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग राज्यातील इतर जिल्ह्यांमधील शेतकरी संस्थांना त्यांचे कामकाज अधिक कार्यक्षम करण्यासाठी होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

परिषद आणि प्रमुख उपस्थिती

ही उच्चस्तरीय परिषद मुंबईतील नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये ३० मार्च २०२६ रोजी संपन्न होत आहे. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे पणन, राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ आणि मॅग्नेट प्रकल्प (पुणे) यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या परिषदेत मंत्री महोदय स्वतः उपस्थित राहून राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थांच्या अडचणी समजून घेणार आहेत आणि त्यावर उपाययोजना सुचवणार आहेत.

या विषयांवर होणार मंथन?

राज्यातील कृषी मालाच्या विपणनाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी या कार्यशाळेत सखोल चर्चा होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी उत्पादक संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असणारे धोरणात्मक बदल आणि प्रशासकीय मार्गदर्शन. उत्पादित मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी बाजारपेठेची उपलब्धता आणि ‘व्हॅल्यू एडिशन’ च्या विविध संधींचा आढावा. संस्थांना लागणारा वित्तपुरवठा, विविध बँकांच्या कर्जसुविधा आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी. सहकार आणि पणन विभागाच्या विविध योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. संस्थांच्या प्रत्यक्ष कामकाजात येणाऱ्या तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणी समजून घेऊन त्यावर तज्ञांमार्फत उपाय सुचवणे, या मुद्द्यांवर जावळे आणि इतर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!