नवी दिल्ली,(हिंदवार्ता): देशातील राजकीय हवामान सध्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी तापले आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमधील निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट झाले असून, भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत पश्चिम बंगालमध्ये सत्ता काबीज केली आहे. दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये थलपथी विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने पहिल्याच निवडणुकीत अनपेक्षित यश मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला ढासळला
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. नंदीग्रामनंतर आता भवानीपूर या आपल्या बालेकिल्ल्यातही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा १५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. २९४ जागांच्या विधानसभेत भाजपने बहुमताचा आकडा पार करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाला ‘भारतीय लोकशाहीचा विजय’ म्हटले आहे.
तामिळनाडू: थलपथी विजय यांचा ‘सुपरहिट’ पदार्पण
तामिळनाडूत पारंपरिक द्रविडीयन राजकारणाला धक्का बसला आहे. अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ पक्षाने पहिल्याच प्रयत्नात मोठी झेप घेतली असून, ते विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहेत. तर पुद्दुचेरीमध्ये एनडीएने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.
आसाममध्ये ‘हॅट्ट्रिक’; भाजपची सत्ता कायम
ईशान्य भारतातील महत्त्वाच्या अशा आसाम राज्यात भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. १२६ जागांच्या विधानसभेत एनडीएने ६४ या बहुमताच्या आकड्याला सहज ओलांडले आहे.