ॲड. वर्षा पालकर यांना ‘अहिल्यादेवी होळकर’ पुरस्काराने गौरव; महिला सक्षमीकरणाचा बुलंद आवाज

बुलढाणा,(प्रतिनिधी): स्त्रियांनी केवळ उंबरठ्याआड न राहता अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि स्वावलंबी बनावे, या विचाराने प्रेरित होऊन महिलांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या ॲड. वर्षा विशाल पालकर यांना २०२६ चा मानाचा ‘अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, १ मे २०२६ रोजी बुलढाणा येथील जिल्हा पोलीस कवायत मैदानावर आयोजित भव्य शासकीय सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी देवरे, पोलीस अधीक्षक तांबे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल कुमार डिघोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि संचलनाने झाली. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये महिला सक्षमीकरण आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल ॲड. वर्षा पालकर यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ॲड.वर्षा पालकर यांचे कार्य केवळ न्यायालयीन कामकाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी समाजातील तळागाळातील महिलांसाठी एक सुरक्षा कवच निर्माण करण्याचे काम केले आहे. वकील म्हणून प्रॅक्टिस करत असताना त्यांनी अनेक कौटुंबिक हिंसाचार पीडित महिलांना न्याय मिळवून दिला. केवळ कायदेशीर मदतच नव्हे, तर पीडित महिलांचे पुनर्वसन करण्यासाठीही त्यांनी वैयक्तिक पातळीवर मोठे प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी गावोगावी कायदेशीर साक्षरता शिबिरे आयोजित केली. अनेक स्त्रियांना कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देत त्यांना मानाने जगण्याची दिशा दाखवली. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी त्यांनी विविध बचत गटांना मार्गदर्शन केले आणि कौशल्यावर आधारित रोजगारासाठी प्रोत्साहन दिले. पुरस्कार प्रदान केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री मकरंद जाधव म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्याप्रमाणे जनहितार्थ आणि महिलांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले, तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून ॲड. वर्षा पालकर कार्य करत आहेत. समाजातील महिला सुरक्षित आणि सक्षम झाल्याशिवाय जिल्ह्याचा आणि पर्यायाने राज्याचा विकास पूर्ण होऊ शकत नाही. पालकर यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष महिला ही समाजाची खरी संपत्ती आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल कुमार डिघोळे महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी ॲड. पालकर यांनी नेहमीच मोलाचे सहकार्य केल्याचे सांगितले.

पुरस्काराचे महत्त्व आणि भावना

‘अहिल्यादेवी होळकर’ हा पुरस्कार महिला क्षेत्रातील कार्यासाठी दिला जाणारा एक अत्यंत प्रतिष्ठित सन्मान मानला जातो. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲड. वर्षा पालकर भावूक झाल्या होत्या. त्यांनी हा पुरस्कार जिल्ह्यातील त्या प्रत्येक महिलेला समर्पित केला, जी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी धैर्याने उभी आहे. हा सन्मान म्हणजे माझ्या कार्याला मिळालेली पोचपावती तर आहेच, पण सोबतच माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजातील शोषित आणि पीडित महिलांना न्याय मिळेपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील, असे मत ॲड. पालकर यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

ॲड. वर्षा पालकर यांना हा पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच बुलढाणा जिल्ह्यात सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वकिली क्षेत्र असो वा सामाजिक क्षेत्र, दोन्हीकडे त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक संघटना, वकील संघ आणि राजकीय नेत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. बुलढाण्यासारख्या जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असून, पालकर यांच्या या कार्यामुळे जिल्ह्यातील इतर तरुण मुलींना आणि महिलांना सामाजिक कार्यात येण्याची प्रेरणा मिळणार आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

आपले कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार

पुरस्कारानंतरही ॲड. पालकर यांनी आपले कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला आहे. आगामी काळात त्या जिल्ह्यातील दुर्गम भागातील महिलांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या धावपळीच्या युगात जेव्हा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत, अशा वेळी ॲड. वर्षा पालकर यांच्यासारखे खंबीर नेतृत्व समाजाला दिशा देणारे ठरणार आहे. त्यांच्या या पुढील वाटचालीस जिल्ह्यातील समस्त जनतेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!