अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत जणू काही ‘गायब’ होण्याचे सत्रच सुरू झाले आहे. एकामागून एक तब्बल ७ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारींनी पोलीस दप्तरातील कागदं वाढली आहेत, तर दुसरीकडे अनेक कुटुंबांची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्यांमध्ये कॉलेजला जाणाऱ्या दोन तरुणी, चार विवाहित महिला आणि एका ८ वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. या सर्व घटनांमागे काही समान धागेदोरे आहेत का? की हा केवळ एक योगायोग आहे? या प्रश्नांनी जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला चक्रावून सोडले आहे.
शेगाव: कॉलेजला गेलेल्या लेकी परतल्याच नाहीत!
शेगाव शहरातून दोन तरुणी बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
रहस्यमय स्कूटी: १८ वर्षीय **लक्ष्मी रवींद्र गुजर ही तरुणी १३ एप्रिलला सकाळी ७ वाजता खामगावला कॉलेजला जाण्यासाठी ‘हिरो स्कूटी’ क्रमांक एमएच-१४-जीझेड-३१७१ ने घराबाहेर पडली. संध्याकाळ झाली तरी ती परतली नाही. तिचा फोनही स्वीच ऑफ होता. शोध घेतला असता, तिची स्कूटी शेगाव बस स्थानक परिसरात बेवारस अवस्थेत उभी असलेली आढळली, पण लक्ष्मीचा पत्ता लागला नाही.
इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी: दुसरी घटना जिजामाता नगरमधील आहे. २१ वर्षीय माधुरी संजय टवरे ही इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणारी तरुणी कॉलेजला जाते असे सांगून निघाली आणि गायब झाली. नातेवाईकांनी कॉलेज गाठले, पण ती तिथे पोहोचलीच नसल्याचे समोर आले.
खामगाव: माय-लेकींचे गूढ अंतर्धान
शिवाजी नगर परिसरातील रेखा प्लॉटमध्ये राहणारे रवींद्र सुकाळे जेव्हा रात्री कामावरून घरी आले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांची २९ वर्षीय पत्नी सुवर्णा आणि ८ वर्षांची मुलगी ऋतुजा घरात नव्हत्या. मोठी मुलगी वेदिका हिने सांगितले की, आई आणि छोटी बहीण नातेवाईकांकडे जातो म्हणून सांगून ४.३० वाजता घराबाहेर पडल्या आहेत. नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्या तिथे गेल्याच नसल्याचे समजले. भरवस्तीतून माय-लेकींचे अशा प्रकारे बेपत्ता होणे अनेक शंकांना जन्म देत आहे.
- ग्रामीण भाग: महिलांचे अचानक गायब होणे वाढले आहे. केवळ शहरेच नाही, तर ग्रामीण भागातही हे सावट पसरले आहे.
नांदुरा (बोराखेडी): शेंबा येथील १९ वर्षीय अंकिता खोंदले ही विवाहिता १३ एप्रिलला दुपारी घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. तिच्या डाव्या हातावर ‘विठ्ठल’ असे नाव गोंदलेले आहे.
हिवरखेड (नागझरी): ४९ वर्षीय सुनंदाबाई लिकडे या बुलढाण्याला उपचारासाठी गेलेल्या मुलाला भेटण्यासाठी मोताळ्याला जाण्यास निघाल्या होत्या. पण त्या ना मुलाकडे पोहोचल्या, ना घरी परतल्या.
सिंदखेड राजा (झोटींगा): १५ एप्रिलच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास २७ वर्षीय कविता पवार ही महिला अचानक घर सोडून निघून गेली. तिच्या हातावर ‘जिवन’ असे नाव गोंदलेले आहे. या सर्व घटनांमध्ये मोबाईल बंद असणे आणि नातेवाईकांकडे किंवा कॉलेजला जातो, असे सांगून निघणे, हे मुद्दे समान आहेत. पोलीस या प्रकरणांत मानवी तस्करी, प्रेमप्रकरण किंवा घरगुती वादाचे कोन तपासून पाहत आहेत. मात्र, एकाच वेळी इतक्या व्यक्ती बेपत्ता झाल्याने जिल्ह्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.