अजय टप
शेगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरात माता-भगिनी सुरक्षित आहेत की नाही? असा संतप्त सवाल निर्माण करणारी एक संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे. शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अत्यंत गजबजलेल्या भैरव चौकात, एका विवाहित महिलेचा भररस्त्यात विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘ब्युटी पार्लर’मधून आपल्या घराकडे परतणाऱ्या ३० वर्षीय पीडित महिलेचा पाठलाग करून, तिला वाईट उद्देशाने धक्का मारून, तिचा हात पकडून ओढण्याचा अत्यंत लाजीरवाणा प्रकार एका नराधमाने केला आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पीडित फिर्यादी महिला (वय ३० वर्षे, रा. पेठ मोहल्ला, शेगाव) या नेहमीप्रमाणे आपले घरकाम आटोपून आणि ब्युटी पार्लरमधील काम संपवून स्वतःच्या घराकडे पायी जात होत्या. दिनांक १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास, जेव्हा त्या भैरव चौकातील ‘इंदिरा दूध डेअरी’च्या समोरून जात होत्या, त्याच वेळी तिथे दबा धरून बसलेला विकृत आरोपी शेख मोसीन शेख अश्पाक (वय अंदाजे २५ वर्षे, रा. जोगडीफैल, शेगाव) हा अचानक तिच्या समोर आला. आरोपीने कोणत्याही कारणाशिवाय, केवळ अत्यंत वाईट आणि वासनांध उद्देशाने पीडित महिलेला भररस्त्यात जोराचा धक्का मारला. अचानक झालेल्या या धक्क्याने महिला भांबावून गेली. मात्र, तिने धीर न सोडता अत्यंत हिमतीने आरोपीला तू मला धक्का का दिला?, असा जाब विचारला. चुकीची माफी मागण्याऐवजी, आरोपी शेख मोसीन याची विकृत मुजोरी आणखी वाढली. भरचौकात त्याने पीडित महिलेला अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही, तर त्याने सर्वांसमक्ष पीडित महिलेचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढण्याचा लज्जास्पद प्रयत्न केला. पीडितेने दिलेल्या तक्रारीत हा आरोपी महिला जेव्हा जेव्हा घराबाहेर पडते किंवा कुठे जायला निघते, तेव्हा तेव्हा हा तरुण तिच्या मागे मागे येतो आणि तिचा छळ करण्याच्या उद्देशाने पाठलाग करतो, असेही नमूद आहे. याप्रकरणी पीडितेने शेगाव शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ७८, ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गावंडे करत आहेत.
माता-भगिनींनी वावरावे तरी कसे?
संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगाव नगरीला एक मोठा आध्यात्मिक वारसा आहे. मात्र, अलीकडच्या काळात जोगडीफैल आणि इतर परिसरातील काही टवाळखोर, मद्यपी आणि विकृत तरुणांमुळे शहरात महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास, जेव्हा बाजारात आणि चौकात शेकडो लोकांची वर्दळ असते, अशा वेळी एका महिलेचा हात पकडण्याचे धाडस आरोपी करतोच कसा? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जर भरचौकात महिला सुरक्षित नसतील, तर त्यांनी रात्री-अपरात्री बाहेर पडायचे कसे?, असा प्रश्न महिला वर्गातून उपस्थित होत आहे.
