अजय टप
संग्रामपूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):तालुक्यातील एका गावातून एक २१ वर्षीय तरुणी कोणालाही काहीही न सांगता राहत्या घरातून अचानक निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक २५ मे २०२६ च्या रात्री ९:०० वाजेपासून ते २६ मे २०२६ च्या पहाटे ४:३० वाजेच्या दरम्यान घडली. सदर तरुणी आपल्या राहत्या घरातून अचानक निघून गेली. सकाळी ती घरात न दिसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. गावामध्ये, तसेच इतर सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर या प्रकरणी २६ मे रोजी दुपारी पाऊणेबाराच्या सुमारास सोनाळा पोलीस ठाण्यात रीतसर माहिती देण्यात आली.
फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून सोनाळा पोलिसांनी मिसींग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संजय पवार हे करीत आहेत.
